दैनिक_लोकशाही_मतदार
कोकणातील रत्नागिरी-राजापूर भागात कातळ शिल्प आढळतात. कोकणातील जांभ्या दगडावर ही कातळ शिल्प कोरलेली आहेत.प्राण्याची चित्र, मानवी आकृती, विविध भौमितिक आकार या खडकाळ भागावर आढळतात. थोडक्यात काय तर दगडावर कोरलेली चित्रं. पण चित्रं मानवी उत्क्रांती साक्ष देतात.
या कातळ शिल्पांमध्ये विविध आकार आढळतात. एक मोठा हत्ती अन् त्याच्या पोटात विविध प्राणी. हे चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिवाय गेंडा, पाणघोडा याचीही चित्र आढळतात. मुळात गेंडा आणि पाणघोडा हे कोकणात आढळत नाहीत. पण मग तरिही या प्राण्याची चित्रं कातळ शिल्पात कशी? हजारो वर्षांपूर्वी गेंडा, पाणघोडा कोकणात आढळायचे की हा मानव स्थलांतरित होता? असे अनेक प्रश्न या कातळ शिल्पांना पाहून उपस्थित होतात अन् हेच प्रश्न आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या जवळ घेऊन जाणारे आहेत.
ऐतिहासिक ठेवा
कोकणात आढळणारी कातळ शिल्प जवळपास 45 हजार वर्षे जुनी असल्याचं बोललं जातं. जेव्हा गटागटाने राहणारा मानव स्थैर्याकडे वाटचाल करू लागला तेव्हाची ही कातळ शिल्प असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी मानव कसा राहत होता? तो कसा जीवन जगायचा? या सगळ्याचा उलगडा ही कातळ शिल्प करू शकतात.
कातळ शिल्पांना पाहून मनात उपस्थित होणारे अनेक प्रश्नच आपल्याला इतिहासाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.


