दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज कारखान्याच्या ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात वित्तीय संस्थांची अडचण असल्यामुळे थोडासा विलंब लागणार आहे, तरीही १५ जूनपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली आहे.सन २०२४-२५ या गळीत हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम अद्यापपर्यंत जमा करण्यात आली नाही. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी आहेत याची आम्हास जाणीव असून त्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २२ मेपासून रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे पत्रक कारखान्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले होते मात्र बँकांकडून वित्त पुरवठा होण्यासाठी तांत्रिक अडचणी पुढे येत आहेत. त्यामुळे थोडासा विलंब लागणार आहे, असे सांगत चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ शुगरला सहकार्य केले आहे, यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले आहे.

